शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात अमळनेरात महाविकास आघाडीचे आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी – २१ रोजी राज्य सरकारने नुकताच शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईत कपात करत ती ३ हेक्टर वरून २ हेक्टरपर्यंत मर्यादित केल्याच्या निर्णयाविरोधात काल रोजी महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर सकाळी ११ वाजता जोरदार घोषणा आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काच्या भरपाईत कपात करणाऱ्या महायुती सरकारचा या आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी विरोधी सरकार हाय हाय, नुकसान भरपाई देणं आमचं हक्क आहे, सरकार जागं हो, शेतकऱ्यांना न्याय दे अशा घोषणा देत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
या आंदोलनात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा असून महाविकास आघाडी त्याला तीव्र विरोध करणार आहे. जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील,भागवत सूर्यवंशी, प्रा सुभाष पाटील, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, योजना पाटील, सेनेचे विजय पाटील, डी. एम.पाटील, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील,मनोहर निकम अनंत निकम आदी उपस्थित होते.