हळदीच्या कार्यक्रमात वाद होऊन दोन गटात हाणामारी

विशेष प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वीच्या खुन्नशीवरून हळदीच्या कार्यक्रमात वाद होऊन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १८ रोजी तालुक्यातील म्हसले गावी घडली. दोन्ही गटातील लोकांविरुद्ध महिलांचा विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने फिर्याद दिली की गावातील राहुल अधिकार पाटील हा २०२३ मध्ये मोठ्या बहिणीला त्रास देत होता. त्यावरून भांडण झाले. २०२४ मध्ये बहीण वारली तरी तो बहिणीवरून शिवीगाळ करतो. १७ रोजी रात्री गावात हळदीच्या कार्यक्रमात पीडितेचा भाऊ भूषण व राहुल यांच्यात वाद झाले. १८ रोजी पीडितेचे आई, वडील, भाऊ अमळनेर पोलीस स्टेशनला राहुल अधिकार पाटील व पवन अधिकार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार करायला गेले असता राहुल अधिकार पाटील व पवन अधिकार पाटील दोघेही हातात कुऱ्हाड घेऊन आले आणि शिवीगाळ करू लागले. पीडितेने घाबरून आई वडिलांना फोन केला. तोपर्यंत राहुल पाटील याने तरुणीचे केस ओढून अंगणात आपटले आणि पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले. पीडितेचे भाऊ आले तेव्हा दोघांनी त्यांनाही शिवीगाळ मारहाण केली. पोलिसांनी कुऱ्हाड व दोघांना ताब्यात घेतले. पीडितेने तक्रार केल्यावरून राहुल व पवन विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७६ , १३१,११५ (२),१५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे पीडित महिलेने फिर्याद दिली की १८ रोजी सकाळी ८ वाजता महिला घरी एकटी असताना गावातील लखीचंद भालेराव पाटील , सचिन लखीचंद पाटील घरी आले आणि काल आमच्यावर केस का केली म्हणून शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. लखीचंद पाटील याने महिलेचा हात पिरगळुन खाली पाडले आणि सचिन याने कपडे फाडून विनयभंग केला. १० वाजता मुले राहुल आणि पवन घरी आल्यावर आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी चौकात गेलो असता लखीचंद व सचिन यांनी हातातील लाकडी फळ्यांनी दोघा मुलांच्या हातावर ,पाठीवर , पायावर ,डोक्यावर मारहाण केली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.