एरंडोलला सहाव्या दिवशी पाणीपुरवठा.महिलांची पाण्यासाठी भटकंती.

प्रतिनिधी एरंडोल – शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणा-या अंजनी प्रकल्पातील
जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे शहरात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात
येत आहे.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महिलांना पाण्यासाठी
भटकंती करावी लागत आहे.ग्रामीण भागातील कासोदा,रिंगणगाव,आडगाव,विखरण यासह
अनेक गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
शहरासह कासोदा,जळू,नांदखुर्द,फरकांडे यासह अनेक गावांना अंजनी
प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.सद्यस्थितीत अंजनी प्रकल्पातील
जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे शहराला सहाव्या दिवशी पाणीपुरवठा
करण्यात येत आहे.प्रकल्पातील जलसाठ्यातील पाण्याचे वाढत्या तापमानामुळे
मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्यामुळे मे आणि जूनमध्ये पाण्याची
गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरात काही भागात सहाव्या
दिवशी तर काही भागात आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे
महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे
काम अत्यंत संथगतीने सुरु असून पावसाळयापूर्वी सदर योजनेचे काम पूर्ण
करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.तालुक्यातील सर्वात मोठी
ग्रामपंचायत असलेल्या तसेच सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या कासोदा
येथे आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त
झाले आहेत.कासोदा येथे देखील अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात
येतो.रिंगणगाव येथे गिरणा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो.याठिकाणी देखील
चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.आडगाव येथे गिरणा नदीवरून
करण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून याठिकाणी
ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत
आहे.पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यास गावाची पाण्याची समस्या
कायमस्वरूपी दूर होणार असल्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी
ग्रामस्थांनी केली आहे.विखरण येथे शहराच्या कासोदा रस्त्यावरील असलेल्या
स्मशानभूमीतील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत येत आहे.विखरण येथील
जलजिवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या योजनेचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांना
पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा
योजना अंजनी प्रकल्प व गिरणा नदी येथून कार्यान्वित आहेत.अंजनी प्रकल्प
आणि गिरणा धरण येथील जलसाठ्याच्या क्षमतेनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन
करण्यात येत असते.शहरासह ग्रामीण भागात अनेक हातपंप नादुरुस्त असून
त्यांची दुरुस्ती केल्यास पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत
होईल.एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह ग्रामीण भागातील अनेक
गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असून मे आणि जून महिन्यात पाणी टंचाई
आणि तीव्र होण्याची शक्यता आहे.तालुक्यात दरवर्षी अनेक गावांना मे आणि
जून महिन्यात tankorद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असतो.नागरिकांनी देखील
पाण्याची समस्या लक्षात घेता पाणी जपून वापरून वाया जाणार नाही याची
दक्षता घेण्याची गरज आहे.शहरातील अनेक सार्वजनिक व खासगी नळांना तोटया
नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.पालिका प्रशासनाने
सार्वजनिक नळांना त्वरिततोटया बसवाव्यात तसेच खासगी नळ धारकांनादेखील
तोटया बसविण्याची सुचना देण्याची गरज आहे.