सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे थांबवा – अब्राहम आढाव यांच्याकडून गृहमंत्री व पोलीस महासंचालकांना निवेदन

प्रतिनिधी पुणे – महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, खंडणीचे आरोप लावणे आणि त्यांना विविध प्रकारे त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार जाणीवपूर्वक भ्रष्टाचार उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांना दडपण्यासाठी केले जात आहेत, असा गंभीर आरोप माहिती अधिकार नागरिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी केला आहे.
यासंदर्भात श्री. आढाव यांनी राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन सादर करून कार्यकर्त्यांना तात्काळ संरक्षण देण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात RTI आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संरक्षण करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणा स्थापन कराव्यात.
कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्याची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
माहिती मागणीनंतर त्रास दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी.
अशा प्रकरणांसाठी विशेष गृहरक्षक दल / विशेष सेल स्थापन करावा.
लाचखोर लोकसेवकांवर त्वरीत कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी.
कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी.
लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचा सहभाग टिकवण्यासाठी घटनात्मक अधिकारांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.
“स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही जर एक सामान्य नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ता केवळ प्रश्न विचारल्यामुळे, माहिती मागितल्यामुळे शहीद होतो, तर ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. यावर त्वरित कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे”, असे श्री. आढाव यांनी स्पष्ट केले.