खड्ड्यातच वृक्षारोपण करत काँग्रेसचे आंदोलन

राज्यमार्ग सहावरील खड्डे बुजवण्याची मागणी
(विशेष प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या मुख्य राज्यमार्ग क्रमांक ६ वरील खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी तालुका व शहर काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलनाद्वारे केली आहे.आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अमळनेर शहरातूनच राज्यमार्ग ६ जातो.मात्र मागील काही महिन्यांपासून अमळनेर कडून बेटावद कडे जातांना अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.त्यातच शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर अजय केले यांच्या घराजवळ खूप मोठ्ठा खड्डा पडलेला असून वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
अमळनेर ते शिरपूर,शिंदखेडा,नंदुरबार या भागाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.दिवसाला हजारो वाहनधारक या रस्त्याने ये- जा करत असतात.मागील ४ – ५ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावरील हा खड्डा भरला असून या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत. रस्त्याला वर्ष ही पूर्ण झाले नसून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.या रस्त्याने गलवाडे रस्त्यावर असणारे अनेक कॉलनीतील नागरिक देखील ये जा करत असतात.
हा खड्डा पावसाळ्याआधी बुजविण्यात यावा यासाठी काँग्रेस तर्फे उपहासात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले,तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष बी. के.सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील,संदीप घोरपडे,बन्सीलाल भागवत,शरद पाटील,गजेंद्र साळुंखे, के. व्हि.पाटील,प्रताप पाटील,दिलीप पाटील,पी. वाय पाटील,तुषार संदानशिव,भगवान संदानशिव,विठ्ठल पवार,प्रमोद पाटील,राजू भाट,बापुराव पाटील,मोहम्मद तेली,मनोहर पाटील,विलास पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.