एरंडोल येथे वादळी चक्री वादळ मेघगर्जनेसह मान्सूनचे आगमन,जनजीवन विस्कळीत…..

प्रतिनिधी एरंडोल – येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा,मेघगर्जना व विजांचा चमचमाट यांच्या अकांड तांडव नृत्यात मान्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले.विशेष म्हणजे वारा,पाऊस, ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट यांच्यात जणू स्पर्धा सुरू झाली की काय असे चित्र निर्माण झाले होते.जवळपास अर्धा तास ढगांच्या,वाऱ्याचा आणि विजेच्या तांडवात पावसाच्या मात्र मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.एकंदरीत गर्जेल तो बरसेल काय? या उक्तीप्रमाणे मेघगर्जना,विजांचा चमचमाट व वादळी वारा यांचे प्रमाण जास्त राहिले.तरी देखील शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या आणि रस्त्यावर पाणी आले होते.
जवळपास अर्ध्या तासात मेघगर्जना,चक्री वादळासह विजेच्या कडकडाटात पडलेल्या ह्या पावसामुळे अनेक ठिकाणी प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे.पहिली दुर्घटना मौजे रिंगणगाव येथे वादळ वाऱ्यात जगन रोहिमारे वय ७५ वर्षे यांच्या अंगावर घराची भिंत पडली त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना जळगाव येथे रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच ते मयत झालेत.दुसरी घटना मौजे फरकांडे येथे काल रात्री नारायण सिताराम पाटील वय ६८ वर्षे हे त्याच्या पत्र्याच्या शेड मध्ये झोपलेले असताना त्याच्या अंगावर पत्रे पडून ते जागीच मरण पावले. अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. महसुल कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तसेच या तुफानी वादळी पावसामुळे धरणगाव रस्त्यावर विजेच्या तारा तुटल्या, छोट्या दुकान दारांच्या टपऱ्या उडाल्या,मोठी निंबाची झाडे रस्त्यावर आडवे पडल्याने धरणगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.या वादळी पावसात एरंडोल येथील बळीराजा कृषी केंद्राच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीमुळे कृषी केंद्रातील बी बियाणे,खते व किटकनाशके यांचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे.तसेच उमरदे व विखरण येथे वादळी वाऱ्यामुळे शेत शिवारातील केळी पिक आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शहरातील मरिमाता मंदिराची पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाली.तसेच म्हसावद रोडवरील मोरया काॅम्प्लेकस चे सर्व खिडक्यांच्या काचा वादळामुळे फुटल्याने नुकसान झाले आहे.तसेच विखरण येथील एकनाथ महाजन यांच्या शेतातील गोडाऊन वर वीज पडून गोडाऊन मधील वर्षभराचा चारा व इतर साहित्य जळून खाक झाला आहे. संपूर्ण वर्षभराचा चारा जळून गेला आहे.सुदैवाने गुरे यातून बचावली आहेत.परंतु या गुरांच्या वर्षभरात लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न मात्र महाजन यांच्या समोर उभा ठाकला आहे.
शहरात अचानक आलेल्या या चक्रीवादळ सदृश पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.या तुफानी वादळामुळे शहराच्या सर्वच भागात जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.शहरात तसेच आजुबाजुच्या परिसरात देखील ठिक ठिकाणी अति वेगवान वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे कोलमडून पडली आहेत,विजेचे खांब वाकून काही ठिकाणी तार तुटले आहेत.परिणामी वारा,वादळ व पाऊस सुरू होताच शहरातील व परिसरातील विद्यूत पुरवठा खंडित झाला.आज सुध्दा विजपुरवठा बंद राहणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.